एका मुलाच्या मनोविश्वाची घुसमट म्हणजे फँड्री चित्रपट. ही घुसमट अधिक अधिक तीव्र होत जाते ती समाजातील अर्थीक विषमता , जातीभेद अन् पूर्वांपार आलेल्या चालीरीती अन् अंधश्रद्धा यांमुळे.
या सर्वांमुळे जांबवतच्या (एक दलित विध्यार्थी ) हळुवार हृदयस्थ कल्पनांचा झालेला काडीमोड अतिशय तीव्र भासतो. शालूला (उच्च वर्णीय सहपाठी विध्यार्थिनी) लिहलेल्या पण तिला कधीही देऊ न शकलेल्या जांबवंतच्या प्रेमपत्रातून त्याची तिच्याविषयीच्या भावनांची आर्तता दिसून येत असतानाच स्वतःच्या जातीबाद्दलची सल दुख देऊन जाते.
अव्यवसायिक कलाकारांनी केलेला व्यावसायिक कलाकारांना मोहात टाकेल असा नैसर्गिक अभिनय अन् त्यास लाभलेली नागराज मंजुळेंची अतिशय सूक्ष्म दिग्दर्शनाची जोड चित्रपटाला अतिशय वास्तवदर्शी बनवते. सुरवातीला शाळा, टाईमपास अशा चित्रपटांचे आवर्तन असण्याची शक्यता गृहीत धरून हा चित्रपट पाहण्याचा मी टाळला, पण परवा तो पाहण्याचा योग आला आणि मग इतरांनाही तो दाखवल्याशिवाय राहिलो नाही.प्रत्येक मराठी रसिक वं अरसिक माणसाने पहावाच असा हा चित्रपट आहे.
शेवटी एवढेच म्हणेन की ही कथा खेडोपाडी आज ही अस्तित्वात असणाऱ्या वर्णभेदावर, अवास्तव पण परंपागात चालीरीतींवर भिरकावलेला दगडाचा वार आहे !
.... विश्व ताऱ्यांचे


