प्राणप्रिय छत्रपती शिवाजी महाराज,
मानाचा त्रिवार मुजरा.
राजं,
अवचित्य आपल्या जयंतीचं !.. अन त्यामुळे आपल्या नसल्याने निर्माण झालेल्या पोकळीचं!
" राजं, स्वराज्याच सुराज्य अजूनही नाही करू शकलो आम्ही. रयतेला आजही उदरनिर्वाह शोधावा लागतोय. बरीच रयत उपाशी आणि अर्धपोटी झोपते. शिक्षण खाजगी सरंजामशाहीच्या सापळ्यात सापडल्याने गरिबी आणि उच्च शिक्षण कधीही न मिळणाऱ्या समांतर रेषा झाल्यात. स्वराज्य चालवणारी बरीच मंत्रिमंडळं, आली अन गेली. पेशवाईत जडलेल्या काही सवयी मात्र नाही गेल्या. भ्रष्टाचार फणा काढून राज्याच्या तिजोरीवर विळखा घालून सरकारी इतमामात बसलेला असतो. आज ही बळीराजा पावसावर अवलंबुन आहे. तो शेवटी धीर सोडून आत्महत्या करत आहे. कारण तुमच्यासारखा वाली कोणी भेटलाच नाही राजं."
"राजं, तुम्ही परस्त्रीला माता समजायचं, आज इथे कित्येक स्वराज्यकांक्षीनि, मनुष्यदेहधारी दानवांच्या कामाग्नीत भस्म होतायत. पण या रावनांना त्वरित शिक्षा होत नाही. स्वराज्यात एकत्र गुण्यागोविंदाने नांदत होती, ती होती तुमची निष्ठावंत रयत. तुम्ही कधीच भेदभाव नाही केलात. पण आज इथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, विविध जाती जमाती स्वतःचे स्वतंत्र मुलुख बनवू पाहतात.आशा वेळी तुमची कमतरता अतिशय हिरीरीने जाणवते."
"राजं, तुम्हाला माहीत नसेल, पण आज कितीतरी राजकीय पक्ष तुमच्या नावाचा उपयोग करून घेतायत. तुम्ही तेंव्हा नसाल, त्याही पेक्षा आज खूप खूप प्रसिद्धी झोतात आहात. आपली दिव्य प्रतीमा प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये मिळेल. बरेच युवक तुमचं तेज, वापरून स्वतःची केवळ शिवभक्त म्हणून ओळख निर्माण करू पाहतायत."
"राजं, आपल्या महान पराक्रमाची गाथा संपूर्ण विश्वात गायली जातेय. पण तरीही तुमचं स्वराज्य अजून सुराज्य होऊ शकले नाही. कारण आपल्या सोयीनुसार आपल्या नावाचा फक्त वापर करून प्रौढी मिरवण्यात आजचा युवक गुंतलाय. जागो जागी आपले पुतळे स्थापित करून डी. जे. वर नृत्य चालू आहे."
"आपली शिकवणूक, स्वराज्य प्रेम, पर स्त्री सन्मान, समता, राज्य कारभार, दृढता, दूरदृष्टी, अन्याया विरुद्ध पेटून उठण्याची कर्मठता, मावळ्यांमध्ये निर्माण केलेली स्वराज्याविषयी प्राणांतिक निष्ठा या गोष्टी आजही केवळ आदर्श मानल्या जातात. तुमच्याच आधुनिक रयतेने एक म्हण पण शोधली आहे, 'शिवाजी जन्मावा तर शेजाऱ्याच्या घरात!"
"म्हणून राजं आज मना पासून अस वाटतंय की तुम्ही काही काळासाठी अवतरुन परत एकदा आमची कान टोचणी करा. सुराज्य स्थापन करायचं असेल तर केवळ तुमच्या प्रतिमेची औपचारिक पूजा न करता तुम्ही घाट घातलेल्या कार्यपद्धती, तुमच्या गुणांची सहृदय उपासना व आचरण करावे लागेल. तुम्ही स्वतः येऊन आदेश दिलात तर जास्तीत जास्त रयत सुराज्य स्थापण्यास एकमताने प्रतिबद्ध होईल, आणि मग.. आपल्या स्वप्नातलं स्वराज्य साकार करण्यासाठी, जे आज 'महाराष्ट्र' नावाने ओळखले जाते, पुन्हा एकदा येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर, कोंडोजी बाबा यांसारखी अनेक निष्ठावंत मंडळी पुन्हा एकदा जन्म घेतील. याच कारण इतकी वर्षे झाली पण आमचं आपल्यावर असलेलं प्रेम आणि श्रद्धा कमी न होता वाढतच चाललीय. एकीकडे भौतिक प्रगतिकडे धावत असताना, दुसऱ्या बाजूने होत असलेला मूल्यांचा ऱ्हास, आजही आपल्याच शिकवणीतुन रोखता येऊ शकतो. राजे पुन्हा जन्म घ्या."
हर हर महादेव .
निश्चयाचा महामेरु
बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी ।।
... विश्व ताऱ्यांचे