असा जन्म लाभावा, देह चंदन व्हावा
गंध संपला तरी, सुगंध दरवळत रहावा !!
जीवन फक्त जगण्यापेक्षा ' जीवन ' बननं आणि सहवासात आलेल्या प्रत्येकाला आनंदाची एक झुळूक देऊन पुढील प्रवासास लागण, हसत हसत, सुखात आणि दुखात ही ..... सुयोग हावळ
ज्या क्षणी स्त्री आपल्या स्त्री पणाला आवाहन देऊन पुरुष होऊ पाहते, खऱ्या अर्थाने तिचा ऱ्हास सुरु होतो. अशी गरज असती तर निसर्गाने स्त्री व पुरुष असे दोन भिन्न वर्ग निर्माण केलेच नसते. स्त्रियांची शक्ती स्थाने आणि पुरुषांची शक्ती स्थाने निसर्गतः भिन्न भिन्न आहेत. याचा अर्थ कृपया कोणी स्त्रियांना पुरुषांइतकी समान संधी दिली जाऊ नये असा घेऊ नये. पण संधींचा अर्थ पुरुषांना कमी लेखणे, संघटित होऊन, दोन्ही बाजूंचा विचार न करता पुरुषांवर दबाव प्रस्थापित करणे, स्त्रियांना दिलेल्या कायदेशीर अधिकारांचा उपयोग पुरुषांचे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक शोषण करण्यासाठी जर केला जात असेल तर हजारो वर्षांपासून जपलेली आपली समाज व्यवस्था विस्कळीत होण्याला वेळ लागणार नाही. आधुनिक काळात हे सर्रास आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या स्त्री शक्तीने एकत्र कुटुंब व्यवस्था टिकवली होती आज तीच स्त्री स्वतंत्र होऊ पाहते आहे. मिळालेल्या स्वातंत्र्यातही ती आपल्या स्त्री पणाच्या जोरावर पुरुषांच्या स्वातंत्र्यावर आधिराज्य गाजवू पहात आहे. असा जर आपल्या समाजव्यस्थेचा पायाच जर ठिसूळ झाला तर व्यवस्था कशी टिकणार? आधुनिक काळात या एका गोष्टीमुळे नातेसंबंधात असंख्य गुंतागुंती झालेल्या पाहायला मिळतात. म्हणने एवढेच आहे आणि अतिशय स्पष्ट आहे की स्त्रियांनी स्त्री राहावे आणि पुरुषांनी पुरुष. एकमेकांच्या निसर्गदत्त स्वतंत्र अस्तित्वाचा दोघांनीही आदर करावा.