February 15, 2026

भिरकीट

                         आयुष्यभर इतरांना मदत करून लोकांचे जीवन वसवणाऱ्या एका भल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारांमध्ये समाजाचा, त्याच्या कुटुंबाचा प्रतिसाद कसा दिला गेला अन् तो कसा असायला हवा होता या दोहोंमधील 'बदलते समाज मानस' म्हणजे अनुप जगदाळे यांचा भिरकिट चित्रपट पहायचा मला काल  योग आला. 


                   सोशल मिडीया, टीव्ही मालिका  मधील अभासी व्यक्तिरेखांच्या भावविश्वास गुंतलेल्या तरुण पीढीला घरातील वडीलधाऱ्या  सदस्यांच्या भावना सांभाळताना मात्र जीवावर येते. जीवन मूल्ये  संपत चाललेल्या समाजात वृद्‌धापकाळ म्हणजे शापच ! याचे हृदयद्रावक चित्र‌ण म्हणजे घशाला कोरड पडली म्हणून् सूतळीने  पलंगाला बांधलेली घंटा वाजवणारा, ज्याने गावातील सुमारे दीडशे तरुणांची मुंबईतील  मीलमध्ये  नोकरी लावून त्यांची आयुष्य वसवली असा 'जाबर' म्हातारा, अणि हे ऐकूनही न ऐकणारी, अगदी स्वतःची मुलगी पडून तिच्या गुडघ्याला इजा झाली तरी न हालणारी  टीव्ही मालिकेमध्ये  मध्ये गुंतलेली त्याची सून आणि या हेळसांडीमध्ये होणारा म्हाताऱ्याचा मृत्यू ! आणि भरीस भर म्हणून  याच वेळी 'जाबर'ची  बायको म्हणजे वृद्‌ध सासूला  गावच्या नदीवर कुटुंबाचे धुणे धुण्यासाठी पाठवलेले  असते.  जाबर म्हणजे जुन्या काळात मुंबईमध्ये ज्या मील होत्या त्यामध्ये मुकादमांचा मुकादम असे एक पद असायचे आणि या पदाला थोडे अधिकार असायचे.


                              पूर्वी गावचा, वाडी-वस्तीवरील एखादा गावकरी मयत पावला तर सर्व गावाला सुतक लागायचे, या  काळात कोणतेही शुभकार्य गावात करणे अशुभ मानले जायचे दु‌खात बुडालेल्या कुटुंबाला दुखी किंवा एकटे पाडून द्यायचे नाही अशी पवित्र भावना यामागे  होती. मात्र झटपट यश मिळवण्याच्या इर्शात्मक स्पर्धेत अडकुन भावनिक कोरडेपणा आलेला अन न जाणे कोणते क्षितिज गाठण्याच्या अभासी गतीचक्रात "भिरकीटलेला" समाज या घटनेप्रसंगी आप‌आपले फायदे तोटे  पाहत अंत्यविधीत  केवळ एक कर्मकांड म्हणून पोकळ मनाने एकत्र आलेला दिसतो.  


                                मृत्यूमुळे अंत्यविधीला जमलेल्या गर्दीचा फायदा कोणीतरी आपल्या राजकीय अजेंडा साठी  वापरतो. प्रेमी युगल सर्व गाव दुखवट्यात् गुंतलेले असल्याने भेटण्याच्या नवनवीन संधी शोधत राहते. सर्व लोक  मयताच्या घरी जमल्याने त्यांना मोकळेपणा भेटतो. नवऱ्याला जबरदस्तीने  घेऊन मुंबईत राहणारी जाबरची नखरेल सुन आणि साधे रंगकाम करणारा पण शहरात राहणारा म्हणून टेंभा मिरवणारा जावई यांना म्हाताऱ्याच्या मृत्यूमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आल्याबद्दल येणारी चीड मन सुन्न करून जाते. तर गावात राहणारा मोठा मुलगा  म्हाताऱ्याचा जाबर म्हणून पंचक्रोशीत असलेल्या चांगल्या प्रतिमेचा आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी कसा फायदा होईल या विचारात गढलेला असताना दुखाचा आव कसा आणतो हे पाहिले की आपल्या जीवनाची खरच किती किंमत इतरांना आहे  हा एकच प्रश्न आपल्या मनात एखाद्या भुंग्यासारखा डंक मारत मारत घोंगावतो.

                    जाणीवपूर्वक मयत सभेत श्रृंगार करून आलेली मुंबईची सून आणि तिला न्याहाळण्यात गुंतलेला समस्त पुरुष समाज खरचं मृत्यूला ही लाज वाटावी असाच भासतो. राजकारणी किती  स्वार्थी असतो ते कळते जेव्हा अंत्यविधीप्रसंगी अग्नीदानावेळी तो सर्वांना मयताच्या नावाने निवडणुकीसाठी मते मागतो, स्वताःच्या जयजयकाराच्या घोषणा देण्यास शोकसभेला भाग पाडतो. अंत्यविधीनंतर लगेचच रक्षा विसर्जन ही झाले नसताना म्हाताऱ्याची दोन मुले व जावई आयुष्यभर म्हाताऱ्याने क‌मावलेल्या मालमत्तेची व आपली आई कोणाकडे किती दिवस राहणार याची वाटणी करायला लागतात. त्यावेळी दुःख छातीत घट्ट धरून ठेवलेल्या निशब्द आईच्या वेदना कोणत्याही सच्च्या भावनिक व्यक्तिला यातना देऊन जातात. 


                            स्वार्थाच्या मायाजाळात "भिरकीटलेल्या" मुलांना वास्तवाचे भान अंशत: कृष्णसदृश्य भूमिका केलेले गावचे तात्या करून देतात. परंतू वेळ खूप पुढे निघून गेलेली असते आणि पुढे काय अघटित घडते हे मला वाटते आपण संपूर्ण चित्रपट पाहूनच अनुभवावे. वर्णन ऐकून तुम्हाला हा खूप गंभीर चित्रपट आहे असे वाटले असेल पण थांबा , हा एक विनोदी चित्रपट आहे. हसवत हसवत शेवटी चित्रपट अपल्याला निशब्द करतो. विनोदातून वास्तवाचे चित्रण करणारे दिग्दर्शक आणि लेखक मला खरच प्रतिभाशाली वाटतात.


काय मग? घटना आपल्या जवळचीच वाटते ना, भिरकीटलेल्या समाजात आपले स्वागत आहे! समाजाचा आरसा दाखवणारे चित्रपट पाहायला समाज शक्यतो धजत नाही कारण वास्तव हे डोळ्यात अंजन घालणारे तिखट असते.


                                                                                                                                                                                                                                                                                                            

                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                ...      विश्व ताऱ्यांचे

20 comments:

  1. Khup chhan lekh. Manala bhabla

    ReplyDelete
    Replies
    1. मी पाहिला होता पिक्चर पण तू लिहिलंस मात्र छान सुयोग

      Delete
  2. खरं म्हणजे मला भीर्किट पाहायचा होता, खूप छान लिहिले आहे, तुमचा ब्लॉग वाचल्यावर भीर्किट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. 👌👍👍👍

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलं आहेस, पैशासाठी माणूस नातीगोती विसरत चालला आहे

    ReplyDelete
    Replies
    1. थोडासा प्रयत्न केलाय, धन्यवाद

      Delete
  4. सद्यस्थितीतील समाजातील वास्तव रुप लिखाणातून मांडले आहे खुप छान..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.. इतरही लेख वाचून घ्याल

      Delete
  5. खूप सुंदर लिहले आहे वाचून भिर्किट मधील वास्तव खुपच खोल मध्ये समजन्यास मदत झाली

    ReplyDelete
  6. सुयोग सर आपले अभ्यासपूर्ण लेखन..वाचतच रहावे असे वाटत आहे..खूप छान लेख.👍🏻

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला वाचतच राहाव असे वाटत असेल तर मला लिहितच राहावे लागेल.. प्रेरणेबद्दल खूप धन्यवाद.

      Delete
  7. खूप छान लिहिलं आहेस,ब्लॉग वाचल्यावर भीर्किट पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

    ReplyDelete
  8. छान लिहले आहे

    ReplyDelete
  9. आता हा चित्रपट बघणे आहे मी, खूप छान लिहिले आहे

    ReplyDelete
  10. भिरकीट चित्रपट पहिला नाही. पण वास्तव चित्र डोळ्यासमोर उभे ठाकले त्या शब्द रचनेतून माझ्या कल्पक बुद्धीला जाणीव झाली माणूस पैशापुढे लोटांगण घालतो पण जल्म देणाऱ्या नात्यांना विसरून जातो पाठीमागे राहिलेल्या वाटणी करतो, राहतात मात्र आठवणी... म्हणूनच काय की कर्म करत राहणे एवढाच हातात

    ReplyDelete
  11. अतिशय सुरेख टिप्पणी आणि मार्मिक भाष्य…👌🏻

    ReplyDelete
  12. छान झालं आहे लिखाण. लिहित रहा. शुभेच्छा

    ReplyDelete